11 वी सद्भावना सायकल यात्रा नांदेड ते आहिल्यानगर ( वृत्तांत क्र.1)

11 वी सद्भावना सायकल यात्रा ( वृत्तांत क्र.1)
5 दशके साधनेची,
समर्पित कर्मयोग्यांची !
नांदेड,दिनांक 30 डिसेंबर 2025…
सद्भावना सायकल यात्रेच्या निमित्ताने नांदेडच्या पंचक्रोशीतील नेरली येथील नंदनवन प्रकल्पाला आम्ही पहिल्या दिवशी भेट दिली. येथील पाच दशकांची समर्पित सेवा साधना आणि येथे भेटलेले कर्मयोगी यांनी सर्व सायकल यात्रीना प्रेरित केले.सोमवार ,दिनांक 29 डिसेंबर .रोजी दुपारी 1 वाजता सद्भावना सायकल यात्रेतील सर्व सहभागी स्नेहालय पुनर्वसन संकुल अहिल्यानगर येथे गोळा झाले. अहिल्यानगर प्रमाणेच सोलापूर, नाशिक, पुणे , मुंबई इ . जिल्ह्यातून सायकल यात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते आले. यात सर्वात लहान 15 वर्षांचा तर सर्वात ज्येष्ठ यात्री 79 वर्षांचा . तो देखील पत्नीसह सहभागी झालेला. ते म्हणजे सौ . हिरा आणि बाजीराव कानवडे हे संगमनेरचे माजी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते.
मध्यप्रदेश मधून आलेला देव मोदी, ओडिशाची आरूपा गौडा असे बहुभाषिक प्रतिनिधित्वही यात्रेत आहे..
सर्वांचे परिचय सत्र सायंकाळी 5 वाजता स्नेहालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात संपन्न झाले. येथे पहिली सामूहिक सर्व धर्म प्रार्थना झाली.. सायकल यात्रेचा उद्देश, सर्वत्र म्हणावयाची गाणी, द्यायच्या घोषणा यांचा सराव करण्यात आला…
रात्री दहा वाजता सर्व,45 सायकल यात्रीना घेऊन स्नेहालय मधून बस निघाली. ती सकाळी आठ वाजता नांदेड येथील श्रीनिवास गार्डन , या मंगल कार्यालयात पोहोचली. श्री नितीन थाडे सर, यांनी स्थानिक रोटरी क्लबच्या मदतीने येथे मुक्कामाची उत्तम सोय केलेली होती.
यात्रेच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळीच नांदेड येथील सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट देऊन करण्यात आली. गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील गुरुद्वारात सर्व सायकल यात्रेकरूंनी सामूहिक प्रार्थना केली. लंगरचा आस्वाद घेतला.
यानंतर नेरली या गावात असलेल्या *नंदनवन* या संस्थेला भेट दिली.
सेवा व पुनर्वसन कार्यासाठी समर्पित ही संस्था गेली पाच दशके येथे खूप मोठे काम करीत आहे. येथे कुष्ठरोगी आणि विशेष गरजू मुलांसाठी समर्पित भावनेतून काम केले जाते.
या संस्थेचे कार्य, उद्दिष्टे, ध्येय तसेच सामाजिक सेवेमागील भूमिका याविषयी श्री. मनोहर रामजी जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी सी.ए. विजय मालपाणी आणि श्री. हर्षद शाह इ .उपस्थित होते.
संस्थेच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर सर्व सायकल यात्रेकरूंनी नंदनवन येथील लाभार्थ्यांसाठी अन्नवाटपात सक्रिय सहभाग नोंदवला . संस्थेच्या सेवा उपक्रमात हातभार लावला. त्यानंतर येथेच सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. येथे नंदनवन संस्थेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्यात आला.
यामध्ये एस. एम
पवार गुरुजी, डॉ. स्वप्निल सुनील कदम ,
गोविंद बजाज ,
मनोहर रामजी जाधव ,
बनारसीदास अग्रवाल भैयाजी , डॉ. लक्ष्मीकांत बजाज ,राजेश लोटिया ,तुकाराम गायकवाड यांचा समावेश होता…
यातील बनारसीदास अग्रवाल हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. 95 वर्षे वयाचे बनारसीदास आजही 20 संस्थांचे पूर्णवेळ काम करतात…
संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्यानुसार
“वेचूनीया धन ,
उत्तम व्यवहारे ,
उदास विचारे,
वेच करी “
याचे हा माणूस जिवंत उदाहरण आहे. व्यवसाय व्यापारातून मिळालेले पैसे अनेक विविध सामाजिक संस्था आणि कामांना तो रोज उदारमनाने देत असतो, जगण्याचा भरपूर आनंद घेत असतो.
सामाजिक काम करत असताना उपयोगी पडतील असे त्यांचे अनुभवाचे बोल सर्वांनी ऐकले…
विकास सुतार
मो.नं.9011026102




