जालना जिल्ह्यातील अकोला या छोट्याशा गावातील प्रभाकर ते राष्ट्रीय कबड्डीपटू

जालना जिल्ह्यातील अकोला या छोट्याशा गावातील प्रभाकर ते राष्ट्रीय कबड्डीपटू
राष्ट्रीय कबड्डीपटू : स्वा. प्रभाकरभाऊ गिते
अकोला निकळक हे बदनापूर जि. जालना जिल्ह्यातील एक लहान खेडेगाव. बदनापूर पासून हाकेच्या अंतरावर असलेले. बहुतांश शेतकरी पार्श्वभूमी असलेले. उत्तम शेती करणारे अनेक शेतकरी या परिसरात आपला नावलौकिक ठेवून आहेत. आजही गावात एकत्र कुटूंब पद्धतीने जगणारे , वागणारे अनेक कुटूंब आहेत. गावात गिते, केकान, तांबे, मुंढे, खेडकर या आडनावाची माणसं आहेत. याच गावातील गिते कुळात नामवंत व ख्याती प्राप्त प्रगतशिल शेतकरी स्व. रखमाजी पा. गिते होऊन गेले. शेतीनिष्ठ शेतकरी. त्यांना पाच मुले व एक मुलगी होती. त्यापैकी सर्वांत थोरला मुलगा म्हणजे स्व. प्रभाकर भाऊ गिते. सर्व गाव व जिल्हयात ते परभू भाऊ गिते म्हणून प्रसिद्ध होते. ते एक कुशल संघटक, ध्येयवादी व विकास प्रेमी , प्रभावी वक्तृत्व व नेतृत्व असलेले अत्यंत धाडसी व कर्तबगार असे व्यक्तिमत्व होते. पिळदार शरिर, उंच बांधा, गोरेपान आणि प्रचंड करारी असा त्यांचा बाणा होता. देखणे व राजबिंडे व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. ते उत्तम कबड्डी पटू व अकोला गावचे अनेक वर्ष सरपंच होते. राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. मदतीला तत्पर धाऊन जाणे आणि अन्यायाच्या विरुद्ध उभे राहाणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच ते सर्वत्र लोकप्रिय होते. राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. अनेक राज्यस्तरीय , राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी पारितोषीके प्राप्त करून जालना जिल्हयाचा व आपल्या गावाचा नावलौकिक वाढविला होता. त्यांचा कबड्डी खेळ पहाण्यासाठी लोक गर्दी करत. त्यांना पकडणे शक्य नसे. सहा फुट उंच उडी मारून ते चढाई करीत. अतिशय चपळ ते खेळाडू होते. अंगात प्रचंड रग होती. अकोला येथील जि.प. शाळेत मिरजकर नामक शिक्षक त्या काळी होते. त्यांनीच अकोला येथे कबड्डीची परंपरा निर्माण केली. त्यातून अनेक खेळाडू घडले, नामवंत झाले त्यापैकीच एक कोहिनूर हिरा म्हणजे स्व. प्रभूभाऊ होते. प्रभू भाऊंनी अनेक कबड्डी पटू घडवले त्यांना प्रेरणा दिली. कबड्डी पटूंचे गाव म्हणून अकोला नि. आजही ओळखले जाते. ही ओळख त्यांनी व इतर खेळाडूंनी मिळवून दिली. गावात जय किसान क्रिडा मंडळाची स्थापना करून आदर्श घालून दिला. त्यातून प्रेरणा घेवून या परिसरात कबड्डी खेळांची समृद्ध परंपरा निर्माण झाली. ती आजही सुरू आहे. खेळ, शिक्षण आणि शेती हे त्यांच्या आस्थेचे विषय होते. साई समर्थ बहुउद्देशिय संस्थेची स्थापना करून त्यांनी आपल्या गावी साईबाबा माध्यमिक विद्यालय सुरू केले. आज हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत. भाऊंचा सहवास व मार्गदर्शन मला विद्यार्थी असतांना लाभले होते. शिक्षणाची व कबड्डी ची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली होती. अकोला येथे त्यांच्या घरी मी दरवर्षी सुट्यात जात असे. सुशिक्षीत असे ते घराणे होते. माझ्या विषयी त्यांना खूप प्रेम व अभिमान होता.तसाच मलाही त्यांच्या विषयी. त्यांच्या मातोश्री स्व. कडताबाई गिते यांनी व भाऊंनी मला कायम आशिर्वाद दिले. असे आमचे स्नेही आमचे भाऊ म्हणजे आमचा अभिमान होते. एक राष्ट्रीय खेळाडू, उत्तम संघटक, आदर्श शेतकरी, आणि नामवंत सरपंच म्हणून ते कायम सर्वांच्या स्मरणात राहील. सरपंच असतांना त्यांनी आपल्या अकोला या गावी खूप मोठे विकास कामे केलीत. गावाला निश्चित अशी दिशा दिली. गावातील विद्यार्थी, युवक यांना प्रेरणा देवून विकासाच्या मार्गावर मार्गस्थ केले. त्यांचे अकोला पंचक्रोशिसह जिल्हाभरात फार मोठा मित्र परिवार होता. नातेसंबंध व मैत्री जपण्याचे प्रयत्न त्यांनी जिवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत केले. प्रभाकरराव गिते हे क्रिडा व राजकीय , सामाजिक क्षेत्रातले चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांना मानणारा व ओळखणारा फार मोठा चाहता वर्ग सर्वत्र दिसून येतो. कुठेही राजकीय, सामाजिक कार्यक्रम असो की कौटुंबिक कार्यक्रम यात त्यांची उपस्थिती असायचीच. पिळदार शरिर, उंच बांधा, मजबूत शरिरयष्टी, भारदार व कणखर आवाज पांढरे शुभ्र कपडे, नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर गांधी टोपी प्रचंड सत्यवादी व परखड असे प्रभाकर भाऊंचे व्यक्तिमत्व होते. मी लहानपणी त्यांच्या घरी अनेकदा वेगवेगळ्या निमित्ताने जात असे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आठपंधरा दिवस त्यांच्या कडे मुक्कामी असे. एकत्र कुटूंब असल्यामुळे त्यांच्या घरी मुलांचा फार मोठा गोतावळा असायचा. आम्ही सर्व मुले त्यांच्या शेतात दिवस रात्र पडलेले असायचो.एकत्र कुटूंबात वाढले जन्मले असल्यामुळे त्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. नकळत तेच संस्कार पुढच्या पिढीवर ही झाले. प्रभाकर भाऊंचे मला विशेष वाटायचे ते उत्तम कबड्डी पट्टू होते . त्यांची कबड्डी पट्टू म्हणून महाराष्ट्राला ओळख होती. त्यांच्याकडून उच्च शिक्षण व कबड्डीचे संस्कार व प्रेरणा मी घेतली. मलाही विद्यार्थी दशेत कबड्डीची आवड निर्माण झाली ती भाऊमुळेच. आजही त्या भागातील लोक त्यांच्या अनेक आठवणी सांगतात. असा माणूस आता त्या परिसरात होणार नाही.वाघाचे काळीज असलेले ते व्यक्तिमत्व आमच्यासाठी व हजारो क्रीडा प्रेमीसाठी कायम प्रेरणादायी आहे. प्रभाकरभाऊ गिते हे राष्ट्रीय कबड्डी पटू होते. एक उत्तम व आदर्श खेळाडू, प्रभावी वक्ते, कुशल संघटक, आदर्श ग्राम विकासाचे शिल्पकार, मैत्री जपणारे,संयुक्त कुटूंब पद्धतीचे प्रेरणास्थान, बंधूप्रेमी, गाव व समाजप्रेमी आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून त्यांची नोंद जालना जिल्ह्याच्या इतिहासात होईलच.
भाऊंच्या स्मृतिस विनम्र अभिवादन !
– प्रा. डॉ. शिवाजी हुसे