वऱ्हाड बैलगाडीने शक्य नाही.. असं वाटतं का

वऱ्हाड बैलगाडीने शक्य नाही.. असं वाटतं का
वऱ्हाड बैलगाडीने शक्य नाही.. असं वाटतं का
अहो जे तुम्हाला आज शक्य वाटत नाही तेच कधी तरी सत्य होते. जसं पुर्वीची लोक दोन तीन लग्न सहजपणे करायची तेच आजच्या मुलांची एकदा लग्न करण्यासाठी मुलगी मिळेना! कसं अवघड झाले माहित असेलच! असो.
काळ जसा पुढे सरकत आहे तसा जगण्याची पद्धत बदलत चालली आहे. आजोबांच्या काळात बैलगाडीने वर्हाडी मंडळी जातं होते हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. शिवाय हे वऱ्हाड कधी एक मुक्काम कधी तर सात मुक्काम असे असायचे. सांगुन सुध्दा खरं वाटणार नाही. आपल्या जुन्या पिढीतील (७० ते ८० वय वर्षे)एखाद्या व्यक्ती सोबत दोन तीन तास गप्पा मारत निवांत बसून बघा. या ७० ते ८० वर्षात काळ किती झपाट्याने बदलला आहे. नंतर घोडागाडी ची प्रथा आली , काही वर्षांत ट्रॅक्टर ट्राॅली मधून वऱ्हाड जाऊ लागले. पुढे लाॅरी ( मोठा ट्रक) चा वापर सुरू झाला. नंतर टेम्पो मधून वऱ्हाड जाऊ लागले. पुढे काळी पिवळी जिप महिंद्रा मधून तर काही वर्षं पिक अप चा आला आता लोक बस किंवा कार असतिल तरच लग्नाला तयार होतात किंवा स्वतः ची, मित्रांची, नातेवाईकांची कार असेल तर जातात. काय बरोबर ना! असो
अहो तेव्हाचा मंडप सुध्दा गंमतीशीर होता. म्हणजे आज आपण जे मांडव डहाळी वाजत गाजत आणतो ना त्याचं मांडव डहाळी चा संपूर्ण मंडप घातला जायचा असा मंडप तेव्हाच्या श्रीमंत माणसाच्या लग्नात असायचा. इतरांच्या लग्नात उपलब्ध असेल तो झाड पाला टाकून मंडप सजवला जाई. आता उद्या कुणी हा लेख वाचून फॅशन म्हणून असा मंडप बनवला तर नवल वाटेल सर्वांना बरोबर ना! .
कसं आहे मंडळी आज आपण पाळत असलेल्या काही प्रथा परंपरा ह्या जुन्या पिढीतील लोकांनी जुना काळ आठवणीत राहील म्हणून जपल्या आहेत. त्यातीलच मांडव डहाळी आहे. लाॅन्स ला लग्न आल्या पासून ही प्रथा संपुष्टात आल्या सारखीच आहे.
लग्ना आधी आपण जे वडे, पापड, शेवाया, कुरडाया, पुऱ्या , इत्यादी चवदार पदार्थ बनवतो याचं मुख्य कारण लगीन घरात जी काही माणसं जमायची त्यांना १५ ते २० दिवस जेवण काय देणार हा प्रश्न निर्माण होईल म्हणून केलेली तजवीज होती. आता आपण ती रित भात म्हणून आणि काही लोक हौस म्हणून फॅशनेबल साठी करता फक्त. सहसा कुणी ते पदार्थ खात सुध्दा नाही. हा कुरडाया तेवढ्या डोक्यात फोडायला कामी येतात नाही का?
बैलगाडी मध्ये माणसाला उन लागु नये म्हणून बांबूच्या काठ्या वळवून गोलाकार छत तयार केले की त्यावर कापड बांधायचं किंवा बांबूची चटयी (ही हल्ली दिसत नाही) बांधायची. शिवाय सोबत कोरडा शिदा असायचा जेवणाची वेळ झाली की झाडाखाली थांबून तीन दगडांची चूल करायची आणि मस्त पिठलं भाकरी चा बेत करायचा. (आताच्या सारखी व्हेज नॉनव्हेज हाॅटेल आणि बार संस्कृती तेव्हा कुठे होती) पिण्याचे पाणी काढायला लोखंडी बादली आणि दोरखंड सोबत असायचा. ( हल्ली थंड जार मिळतात) मुक्काम एखाद्या पाहुण्या घरी किंवा कोणत्याही वस्तीवर केला तरी चालायचं. ती माणसं हवी ती मदत न मागता करायचे. ( हल्ली लोक शेतातून जाऊ देत नाही. आंबा इत्यादी झाडांखाली राखणं बसतात) असो
हळद लावणे याला आजकाल खूप महत्त्व आणि ग्लॅमर मिळतं आहे. पण पुर्वी हा तसा कौटुंबिक गोपनीय प्रकार होता. म्हणजे आपली मुलगी सुंदर दिसावी म्हणून बाया बापड्यांनी घरगुती पार्लर चालवण्याचा प्रकार म्हणू शकतो. म्हणजे मुलगा (नवरदेव) आणि मुलगी ( नवरी) चार चौघात उठून दिसावे म्हणून सर्वांगाला घरगुती हळद दळून लेप करून लावली जायची. संपूर्ण अंगाला तेल आणि हळद लावणे हा आठ दहा दिवस रोज चालणारा प्रकार हल्ली एक दिवस केला जातो. आणि तोही सर्वांच्या साक्षीने बर त्यात उष्टी हळद हा प्रकार बहुदा अनैतिक पद्धतीने घुसला असावा म्हणजे बघा मधल्या काळात नवरदेवाला हार घालताना उचलून घेण्याची पद्धत अशीच घुसली होती. पण सातत्याने तिच्यावर जाणकार मंडळींनी हल्ला चढवला म्हणून आता ती गोष्ट घडत नाही. तशीच ही उष्टी हळद लावणे हा प्रकार असावा बहुतेक असे मला तरी वाटते. असो
एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा एका लग्न घरी घरातील मांजर लुडबुड करू लागली म्हणून म्हातारीने तीला टोपली खाली कोंडुन ठेवली. हे बघितले एका सुनेने आणि ती गोष्ट लक्षात ठेवून तिनेही तिच्या मुलांच्या लग्नात मांजर शोधून आणली आणि कारण नसताना कोंडून ठेवली आणि प्रथा दहा पिढी पर्यंत सुरू राहीली. असो यातील गमतीचा भाग सोडला तर काळा नुसार अशा प्रथा येतात आणि जातात. त्याचं ऐवढ मनाला लावून घ्यायचं नाही.
आता तुम्ही फक्त मुलगी द्या आम्ही सगळं बघून घेऊ असा प्रकार लपून छपून सुरू आहे. आता पळून जाणाऱ्या कोणत्याही जोडप्यांनी कसलाही काळ वेळ न बघता कार्यक्रम केला त्याचं असं काय अलड सांगा बरं! मग आपण उगाच हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे यांत अडकून आर्थिक स्थिती खराब करण्यात काय अर्थ आहे. विचार करा!. असो
कधी काळी किती हुंडा घेतला हे मोठ्या रूबाबात सांगितले जायचे आता हुंडा मागितला तर लग्नच होणार नाही, आयुष्यभर एकट बोंबलत बसावं लागेल. जुन्या पिढीतील लोक हुंडा म्हणून रेडिओ, सायकल, घाटाच पातेले ( तांब्याचे) गाय, म्हैस, शेळी, गाढव इत्यादी वस्तू किंवा प्राणी दिले जात होते. ७० ते ८० च्या काळात घरोघरी जाऊन लग्नाचं आमंत्रण द्यावे लागायचे. त्यासाठी पिशवी मध्ये तांदूळ घेऊन दोन तीन दिवस अगोदर नवरा बायको आणि इतर एक दोघे एक एक करत सगळ्या घरी जाऊन यायचे. शिवाय पाहुणे असलेल्या गावी प्रत्यक्ष जाऊन मुळ लावून यावं लागे ( मुळ लावणे म्हणजे अगदी प्रवास खर्चाला पैसे देऊन) नंतर थोड्या दिवसांनी गावातील न्हावी किंवा इतर कारागिर यांना रोजंदारी देऊन निमंत्रण पाठवली जायची किंवा फार तर गावात चुलबंद आमंत्रण अशी दवंडी पिटवली जायची.
गावात सरकारी कामकाजाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून सर्रास वापरला जाणारा दवंडी देणे हा प्रकार बहुतेक संपूर्ण महाराष्ट्रात होता. हल्ली रेकॉर्डींग फोन काॅल प्रकार सुरू झाला आहे. पोस्ट आॅफिस द्वारे पत्र पाठवून निमंत्रण करण्याचा काळही आला होता. पण पत्र वेळेत पोहचत नसल्याने लवकरच ती पध्दत बंद करावी लागली . अनेकदा घटना होऊन गेल्यावर निमंत्रण पोहचायचे असे अनेक किस्से आजही मध्यम वयस्कर मंडळी सांगतात. तसेच मध्यंतरी लग्नं म्हटलं की पत्रिका छापून त्या पाहुण्यांना गावोगावी जाऊन वाटप करणे हा प्रकार आला होता. पण तो अत्यंत त्रासदायक ठरला. अनेकदा दुःखद घटना घडल्या म्हणून हळूहळू तो प्रकार कमी झाला. एस टि डी फोन किंवा काॅईन बाॅक्स वरून फोन करून निमंत्रण दिले जाऊ लागले यांत मोबाईल फोन आल्यावर तर दोन दोन वर्षांत बदल घडू लागले आता व्हाट्सअप पत्रिका आणि निमंत्रण प्रकार सुरू आहे. असो
लग्न म्हटलं की वाद्ये आली मग पुर्वी सनई बासरी वाजवत मंगल अक्षदा टाकल्या जात. पुढे सनई धोदाणी पिपाणी अशी वाद्ये आली. पुढे सनई संबळ आले पुढे सनई डफडे आले. सनई ढोलकी आणि गायन आले पुढे पिपाणी ढोल ताशा पथक आले त्याच्या पुढे ढोल ताशा सोबत बॅंजो आला. पुढे बॅंजो आणि गायक गायिका आले. ते जाऊन बॅंजो आरकेस्टा आला पुढे हे दोन्ही विभक्त झाले. बॅंजो चा डिजे झाला. आता सध्या डिजेचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. पण याचाही काळ लवकरच संपणार आहे. असो
लग्न आणि वऱ्हाड हा विषय खूप मोठा आहे एका लेखात बसणार नाही. खूप मोठा लेख हल्ली कुणी वाचत नाही. म्हणून सध्या थांबतो पुढच्या लेखात अजून आठवणी वाचाल पण तुम्ही प्रतिक्रिया देणार असाल तर. एक पात्री प्रयोग काही उपयोगाचा नाही. धन्यवाद 🙏
लेखक पंडित निंबाळकर 🙏